वैशिष्ट्यीकृत पोस्ट

निपून सभी शस्त्रों में हम !

  ना मशीनगन में ही कौशल  निपून सभी शस्त्रों में हम ! डिसेंबर १९४७ : पुंछ,कोटली,झांगर, राजौरी,माचोई आणि नौशेरा उंच हिमालय पर्वतावरील एक ब...

शुक्रवार, ९ जून, २०२३

जातिश्रेष्ठत्वाची‌ स्पर्धा ? भाग दोन !

तुमच्या मनातील अभिमान कोणत्या सैताना ने काढून नेला असेल.......? - मुक्ता साळवे ‌‌‌‌‌     


            देशभक्त लाला लजपतराय यांचे घराणे आर्य समाजिस्ट होते. त्यांचे भारतीय क्रांतिकारकांशी जवळचे संबंध होते तर हिंदी राजकारणातही त्यांचे मोठे नाव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट लालाजींसोबत अमेरिकेत झाली. लालाजींनी बाबासाहेबांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला. बाबासाहेबांनी विनम्रपणे त्यांना नकार देऊन आपले शिक्षण पूर्ण करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. त्यावेळी शिक्षणावर लक्ष केंद्रित करून पुढे समाजपरिवर्तनाची स्वतंत्र वाट चोखाळावी असे बाबासाहेबांचे मत होते. ही धारणा पक्की व्हायला , अमेरिकेच्या राज्यघटनेत गुलामगिरी प्रथेला मुठमाती देणारी  १४ वी दुरुस्तीची घटना घडणे व पीडित निग्रो समाजाचा तारणहार बुकर टी वाशिंग्टन याचे निधन या घटना कारणीभूत ठरल्या. बाबासाहेब व म. जोतीबा फुले यांच्यात साम्य दर्शविणारी बाब गुलामगिरी या ग्रंथातून जोतीबांनी मांडली. जोतीबा कसरत करायचे, दांडपट्टा व गोळी निशाण मारण्याचे शिकायचे त्यावेळेस " सुधारले भट " त्याना इंग्रजांविरुद्ध दंड थोपटण्यासाठी उकसावित होते. या प्रकारातून जोतीबांनी स्वतःची सोडवणूक करून घेतली. गुलामगिरी मध्ये धोंडिबा जोतीबांना प्रश्न करतो व त्याचे उत्तर जोतीबा देतात. हा संवाद मुळातूनच वाचला पाहिजे. 

धों. : --- तर मग तुम्ही लहानपणी दांडपट्ट्याची आणि गोळी निशाण मारण्याची कसरत कशाकरिता करीत होता ? 

जो. :--- आपल्या दयाळू सरकारास पालथे घालण्याकरिता . 

धों. :--- परंतु तुम्ही असली दुष्ट मसलत कोठून शिकला..? 

जो. :--- चार सुधारल्या भट विद्वानांपासून. 
( हा संवाद लांबलचक आहे, जिज्ञासुंनी तो ग्रंथात पाहावा ) या संवादात जोतीबांनी सुधारल्या भटांचे वाभाडे काढले. टॉम्स पेन्स यांच्या ग्रंथांचा हवाला देऊन जोतीबांना इंग्रजांविरुद्ध चिथावण्याचा प्रयत्न भटांनी करून पाहिला. काही दिवस मी तसे वेडेचारही केले ,असे जोतीबा सांगून पुढे म्हणतात ," परंतु पुढे मी जेव्हा त्याच ग्रंथावरून बारीक विचार करून पाहू लागलो तेव्हा या सुधारल्या भटांच्या मतलबी मसलतींचा खरा अर्थ माझ्या ध्यानात आला." पुढे जोतीबा म्हणतात " इंग्रज लोकांच्या आणि तसल्या परोपकारी लोकांस म्हणजे आपल्यास भटांच्या दास्यत्वापासून मुक्त करणाऱ्या लोकांस , आपल्या देशातून हाकून देण्याविषयी त्या विद्वानांची मसलत कोणाच्याने घेववेल ? असा कोण मूर्ख आहे की,ज्याच्याने आपल्या तारणाऱ्यावर आपला हात उगारवेल ? परंतु मी तुला सांगतो की, इंग्रज लोक आज आहेत, उद्या नाहीत, ते आपल्या जन्मास पुरतील म्हणोन कोणाच्याने खास करून सांगवत नाही. यास्तव त्या लोकांचे राज्य या देशात आहे , तोच आपण सर्व शुद्रांनी जलदी करून भटांच्या वडिलोपार्जित दास्यत्वापासून मुक्त व्हावे. " इतकी स्पष्ट भूमिका जोतीबांची होती.  सामाजिक समतेच्या बाबतीत टिळकांची भूमिका कचखाऊच नव्हे तर कट्टर धर्माभिमानी होती.  इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंडाचे बोधामृत पाजणारे लोकमान्यपंथी, गुलामीत खितपत पडलेल्या अस्पृश्यांच्या जीवनात ( अस्पृश्यच नव्हे तर अखिल शुद्रांच्याही ) जीवनात सुधार व्हावा यासाठी कोणतेच पाऊल उचलत नव्हते म्हणून जोतीबांनी सुधारल्या भटांना नाकारले. १८५७ च्या बंडाला जोतीबांनी भटपांड्याचे व भटनानांचे बंड म्हटले. हे बंड अयशस्वी झाले म्हणून ईश्वराचे आभारही मानले. साहजिक आहे, गाय व डुकराच्या चरबीचे निमित्त करून धर्म बुडाल्याची बोंब ठोकून सशस्त्र उठाव करणाऱ्यांनी ढोराडुकरांपेक्षाही नरकातले जीवन जगणाऱ्या अस्पृश्यांकडून काय अपेक्षा ठेवावी ? अस्पृश्यांचा खरा पाठीराखा हा धन्य जोतीबा कसा भटशाहीला चिरंजीव होऊ देणार? महाड आंदोलनात अस्पृश्यांना मरेस्तोवर मारणाऱ्या स्पृश्यांना जेव्हा तुरुंगवासाची‌ शिक्षा झाली तेव्हा बाबासाहेब म्हणालेत " पेशवाई असती तर यांना शिक्षा झाली असती का ? उलट त्यांना निर्दोष सोडल्या गेले  असते व त्यांचा धर्मवीर म्हणून सत्कार झाला असता." आज लोकतंत्र असूनही साध्वी प्रज्ञा ठाकूर व तत्सम धर्मवीरांना सत्ताधारी कशी सन्मानजनक वागणूक देताहेत हे दिसतच आहे.  जर इंग्रजांचे राज्य नसते तर?    
   प्रत्येक आक्रमकांच्या दरबारी ज्यांच्या पूर्वजांनी आपल्या पोटापाण्याच्या सोयी करून घेतल्या, सर, रावबहादूर, दीवान बहादूर सारख्या प्रतिष्ठित पदव्या मिळवल्या, प्रत्येक परकीय सत्तेकडून सोयी सवलती पदरात पाडून आपल्या उद्योगांचे साम्राज्य उभे केले ते देशभक्त व हजारो वर्षाच्या गुलामीतून मुक्तता करून घेण्यासाठी धडपडणारे ते इंग्रजधार्जिणे ही बनवाबनवी आता चालणार नाही. म्हणून भिमा कोरेगाव घडविणारेही देशभक्तच व इंग्रज सरकारला दयाळू म्हणणारेही देशभक्तच ! वस्ताद लहुजी साळवे यांची पुतणी मुक्ता साळवे आपल्या " मांग महाराचे दुःख " या निबंधात म्हणतात,"हाय हाय, काय रे भगवान हे दुःख ! हा जुलुम विस्तराने लिहू लागले तर मला रडू  येते. या कारणास्तव भगवंताने आम्हांवर कृपा करून दयाळु  इंग्रज सरकारास इथे पाठविले!"  जो कोणी वीर लहुजींचा आधार घेऊन शुद्रातिशुद्रांच्या संघर्षमय चळवळीला नख लावण्याचा प्रयत्न करेल तो निश्चितच उताणा पडेल. मुक्ता साळवे पुढे काय म्हणतात हे वाचून , पेशवाई म्हणजे केवळ महारांना जाचक पण मांगांना नाही असे म्हणणाऱ्यांची जीभ घश्यातच जाईल....पुढील भागात पाहू..

- आनंद गायकवाड 


२ टिप्पण्या: