बलिदानाचं कफन डोक्याला बांधून
झेंड्यासह दांडा हातात घेऊन आम्ही !
- आनंद गायकवाड
--------------------------------------------------------------------------
झेंडा हातात घेऊन
म्हणून मी शीतल हवेत बसून
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा झेंडा हातात घेऊन शासन, प्रशासन व जातियवादी मनोवृत्तीच्या समूहाला भिडणारा हा कार्यकर्ता नावाचा प्राणी सर्वबाजूंनी टोचून टोचून मारल्या जाताना आज दिसतोय.
ही बोलकी ओळ कार्यकर्त्यांची अवस्था विशद करायला पुरेशी आहे. कुणी त्याला वर्गणीचोर म्हणतो तर कुणी मवाली. कुणी दलाल म्हणतो तर कुणी सेल्समन. कुणी भाकऱ्या तर कुणी बेवडा म्हणून त्याचा उद्धार करतो. कार्यकर्त्यांच्या अश्रू, घाम, रक्त सांडण्यातून ज्यांचे जीवन सुखमय व गाल गुलाबी झाले ते लेखणीबहाद्दर सुद्धा लेखणीने त्याची चामडी सोलतात. त्याचा दोष एवढाच की ऐन तारुण्यात त्याचा ट्रॅक बदलला. आपल्या बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठताना त्याला आपल्या भविष्याचेही भान राहिले नाही. शिक्षण सुटले, नोकरी नाही, दिवसरात्र समाज... समाज... समाज. शेजारची मधुबाला, तेरी दो टकियाँ दी नौकरी में मेरा लाखों का सावन जाये , म्हणत म्हणत कायमची दूर जाते. कार्यकर्ता आपली शबनम लटकवून पुन्हा सडकेवर उतरतो आणि आकाशात समग्र क्रांतीचे स्वप्न रंगवत बसतो. जशी गरिबी बालपण मोडीत काढते तसे आंदोलनही तारुण्य हिरावून घेते. कार्यकर्त्याला चालता फिरता मिळणाऱ्या शेकडो जयभीमची कमाई सोडली तर जयभीम करता करता टाचा घासून मरणे त्याच्या वाट्याला आलेले मी पाहिले आहे.
घरी परतलेलं बरं !
सांगता येत नाही.
काही दुसऱ्या प्रकारचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेबांच्या उपकारामुळे अनेक बाबुसाहेब जन्माला आलेत. आयुष्यभर नोकरी चाकरी करतांना जे कधी समाजाकडे ढुंकूनही पाहत नाही. जात लपवतात, सामाजिक कार्यासाठी श्रम व पैसाही देत नाहीत ते निवृत्त झाल्यावर कोणत्यातरी धार्मिक संघटनेशी जुळवून घेतात आणि गुडघेदुखीच्या या वयात शूभ्र वस्त्र घालुन गुडघ्यावर वाकून नमो तस्स करताना आढळतात. किंवा राजकीय संधान साधून थेट पदाधिकारी होतात. हे कार्यकर्ते अलिकडे मोठ्या प्रमाणात आढळतील.
मुरलीधर जाधवांनी जो कार्यकर्ता रेखाटला तो आपल्याला पँथर चळवळीपासून ते खैरलांजी हत्याकांड विरोधी आंदोलनात पाहायला मिळतो. नामांतर आंदोलनात हे कार्यकर्तेच कवी,लेखक सुद्धा होते. बरेचदा कवी आणि कार्यकर्ता एकच असतो. तो जे जगतो ते कवितेत मांडतो.
त्याच्यासाठी.............
पावसात गळणाऱ्या झोपडीचं मजबूत छप्पर
शेवटी कविता असते.
अनिल कांबळे या कार्यकर्त्या कवीची ही रचना आहे. वाशीम जिल्ह्यातील पारडी टकमोर या गावात झोपडी नंबर बारा मध्ये तो मजुरी करणाऱ्या मायबापाच्या पोटी जन्माला आला. शिकताना दलित पँथरच्या प्रवाहात सामील झाला. जिंदाबाद मुर्दाबाद चे नारे द्यायला शिकला. नामांतराच्या आंदोलनात लाॅंगमार्च मध्ये सहभागी झाला. तुरुंगात गेला. पक्का कार्यकर्ता झाला. पेटलेल्या वर्तमानाचा पलिता हातात घेऊन खांद्यावरची शबनम सांभाळत मार्गस्थ झाला. आंबेडकरी चळवळीची वाट चालताना स्वतःचे भविष्य पायाखाली कधी दबले याची जाणीवच अनिलला झाली नाही. पोट भरण्यासाठी गुजरात मधील खाणीतील दगडं फोडतानाही जातियतेचे चटके बसलेच. तिथूनच अनिलच्या कवितेचा प्रवास सुरू झाला.
घेऊन दारोदार फिरणारा
अनुभूतीची कविता उधारीत वाटणारा.
संघवाल्याची चड्डी सांभाळत बसणारा
या ग्लोबलायझेशनच्या काळात
मी अविरत चालतच जाणार
मनुच्या पिलावळीला पायाखाली तुडवत.
असा निर्धार अनिलची कविता व्यक्त करते. ब्राह्मणवाद व भांडवलशाहीच्या अनैतिक संबंधातून जन्माला येऊ घातलेली चड्डीवाल्यांच्या स्वप्नातील महासत्ता वांझ ठरली असून ही महासत्ता कुणाची रखेल आहे असा जळजळीत सवाल अनिल करतो. या कवितेला वर्तमानातील धोके माहीत आहेत तर भविष्यातील संकटांची चाहूल लागलेलीच आहे म्हणून ती मुक्याचे सोंग घेऊन मख्खपणे रिलायन्सच्या टॉवरवर उभ्या असलेल्या वांझ महासत्तेवर शरसंधान करते. स्वतःच्या आयुष्याशी दोन हात करताना , खांद्यावरची शबनम व हातात पकडलेला चळवळीचा झेंडा सांभाळून अनिल कांबळे शब्दांचे भीमास्त्र चौफेर फेकतो. या माऱ्यात कार्यकर्त्यांचा वापर करून मोठे झालेले नेतेही सुटत नाही. नेत्यांना कार्यकर्ते मिळतच असतात. वर्षानुवर्षे नेत्यांचे आदेश शिरोधार्य मानून कार्यकर्ता आंदोलनात उतरतो, झेंडा घट्ट धरून ठेवतो, शत्रूंवर दांडाही चालवतो, प्रसंगी पोलिसांचे दंडुके खातो, तुरुंगात जातो, घरात चूल पेटली की नाही याकडे दुर्लक्ष करतो. नेता एकदिवस त्याला घराचा रस्ता दाखवतो. अनिल गेला की नेत्याला अशोक मिळतो, अशोक सुटला की सिद्धार्थ मिळतो. कार्यकर्ते असे बर्बाद होत राहतात. आंबेडकरी म्हटल्या जाणाऱ्या संघटनेचा/ राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असा वाळीत पडतो. कार्यकर्ता निराशेच्या पेल्यात बुडतो तरी शत्रूंच्या झुंडीवर फेकण्यासाठी दगड हातात घेतो. नव्यानेच शुभ्र वस्त्र परिधान करून धम्ममय झालेली नीतीमान व शीलवान मंडळी कार्यकर्त्याला बेवडा संबोधून बौद्ध मानण्यासही नकार देते. दलितांच्या उद्योगपतींनी उभी केलेली संघटनाही उद्योजक कार्यशाळेकरिता कार्यकर्त्यांसाठी दारे बंद करते. सगळीकडून टाकल्या गेलेला हा कार्यकर्ता नवा अस्पृश्य म्हणून आकार घेऊ लागतो. आयुष्यात गमावलेल्या वेळकाळाचे गणित जुळवत शिल्लक राहिलेल्या बाकीतील शून्य, शून्यात पाहत पाहत शून्यातच विलीन होऊन जातो. कार्यकर्त्यामुळे नेत्यांचं जीवन बदलते, आंबेडकरी कार्यकर्ता बदललेल्या नेत्याला कवितेच्या कठड्यात उभा करतो, अनिलने ही तसेच केले....बघा !
तुमच्या खिशासह पोटाचा आकार वाढत गेला
आम्ही आमच्या पोटाचा
विचार न करता
तुमच्या पाठीमागं
बलिदानाचं कफन डोक्याला बांधून
झेंड्यासह दांडा हातात घेऊन.
जागतिकीकरणाच्या रेट्यानं
वाढला तुमचा वेग.
लयभारी तुमची क्रेझ, बिझी तुमचं नेटवर्क
वेबसाईट तुमची होत नाही ओपन
सदानकदा असता तुम्ही नाॅट रिचेबल
कधीतरी मला मॅसेज येतो
नाऊ आय एम अनेबल
डिजिटल बॅनर चौकात झळकला
ईमेल ॲड्रेसवर तुमच्या
बेस्ट कॉम्प्लीमेन्ट्स आल्याच असतील
मी पोस्टानं पाठवलेल्या पत्राची
पोच मात्र आलीच नाही, नेव्हर माईन्ड
तुमची आठवण कायम राहावी म्हणून
वाढदिवसाचं डिजीटल बॅनर
मी आणलं घरी
आडवं बांधलं घराच्या कमजोर छतावर
पावसाळ्यात आधार मिळावा म्हणून.
- अनिल कांबळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा