जातिश्रेष्ठत्वाची स्पर्धा ?
सद्या महारआणि मांगाच्या जातिश्रेष्ठत्वाची स्पर्धा चाललेली दिसते ती दोन्ही जातीगटांना घातक आहे. फार पूर्वी " सोबत " नावाच्या ग. वा. बेहेरे यांच्या नियतकालिकाने " हा कसला महात्मा " या आशयाचा लेख लिहून म. जोतीबा फुलेंना घाणीचं बोचकं म्हटलं होतं. त्यावेळेस या लेखाचा प्रतिवाद फुलेंच्या कुळवाडी किंवा कुळंबी या जातीगटाने केला नाही , यासाठी आंबेडकरी माणसांनीच सोबतकारांचा धिक्कार केला होता. याच सोबत मध्ये विठ्ठल साठे नावाच्या मातंग सद्गृहस्थाने बाबासाहेब व आंबेडकरी चळवळीच्या विरोधात अनेक लेख लिहिले होते. पुढे याच बेहेरे नावाच्या ब्राह्मण विद्वानाने " झाला बुद्ध महार " नावाचे पुस्तक काढून हे लेख प्रकाशात आणले होते. त्यात दलित साहित्य म्हणजे महारांचे साहित्य , धर्मांतर ही आंबेडकरांची पर्वताएवढी चूक , बुद्धापेक्षा श्रीकृष्णाचे दर्शनशास्त्र महान आहे , अशा आशयाचे हे लेख होते . प्रश्न असा आहे की, ब्राह्मणी विचारघारा मानणारे लोक सदैव आंबेडकरी माणसांच्या वा विचारधारेच्या विरोधात उभे ठाकतात याचे कारण एकच आहे की , बाबासाहेबांच्या विचाराने भारलेला समाज ब्राह्मणी धर्माच्या प्रतिष्ठापनेच्या आडवा येतो. म्हणून महाराष्ट्रात दलित समाजातील बौद्धानंतर संख्येने मोठा असलेल्या मातंग समाजाला हे ब्राह्मणी धर्माधिकारीं हाती धरून बौद्धांना आव्हान देण्यासाठी वापर करतात. अलिकडे हे प्रकार वाढीस लागले आहेत. बाबासाहेबांच्या काळात काही महार लोकंही बाबासाहेबांना विरोध करायचेत पण असंख्य महारांपुढे ते हतबल व्हायचे. के. के. सकट नावाचा एक मातंग गृहस्थ सदैव बाबासाहेबांवर गरळ ओकायचा. हा माणूस हिंदू महासभेच्या प्रथम कार्यकारिणीचा सदस्य होता. भोपटकरादी प्रभृतिंच्या प्रभावाखाली हा सकट बाबासाहेबांवर टीका करायचा. अनेक मातंग व चांभार बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करू लागले पण हा सकट मरेपर्यंत हिंदू धर्माभिमानी राहिला. असे अनेक सकट आज सुद्धा पहायला मिळत आहेत व अशा सकटांना सोबतकार बेहेरेंसारखे ब्राह्मणवादी संघीय चड्डीवाले समोर करताहेत. बौद्धांना विरोध करण्यासाठी समांतर व्यक्तिमत्व उभे करावे म्हणून मातंग समाजातील लो.अण्णाभाऊ साठे यांना संघाने पडताळून पाहिले. पण अण्णा हाडाचे कम्युनिष्ट व त्यातल्यात्यात " फकिरा " कादंबरी बाबासाहेबांना त्यांनी अर्पण केलेली. इतकेच नव्हेतर " जग बदल घालूनी घाव , सांगून गेले मला भीमराव "या कवितेने संघाच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या गेले. इथे दोन मुख्य जातीत तेढ निर्माण होत नाही हे पाहून त्यांनी आपला मोर्चा वस्ताद लहूजी साळवेंकडे वळविला.या संघियांनी जय लहूचा नारा जन्मास घातला. हे लहूजी कोण होते ? लहुजी हे राघोजींचे पुत्र. हे राघोजी पेशव्यांच्या बाजूने लढल्याचे सांगितले जाते. त्याच काळात राघोजीच्या इतकाच जवामर्द #सिदनाक पेशव्यांच्या बाजूने पठानांच्या विरुद्ध लढला. त्याच्या कर्तबगारीचे बक्षीस म्हणून माधवराव पेशव्यांनी कळंबी हे गाव सिदनाकाला पुरस्कारादाखल दिले. यानंतर पेशवा व ब्राह्मणशाहीने जे केले त्याचा आलेख लोकहितवादी गोपाळ देशमुख व न्यायमुर्ती रानडे यांनी आपल्या ग्रंथात कोरला. #१_जानेवारी_ १८१८ रोजी ५०० महार व काही मांग सैनिकांनी पेशवाईचा खात्मा केला. या लढ्यात लहुजी साळवे यांचे पुर्वज धारातिर्थी पडले त्याचा राग लहुजींना होता म्हणून ते ब्रिटीशांच्या विरोधात होते. व त्यांनी तालीमखाना उभा करून क्रांतिकारक लो. टिळक , सावरकर , चाफेकर आदींना प्रेरित केले असे अलीकडे काही " लहुवादी " लोकं बोलताहेत. पण या तालीमखान्यात कसरत करणारे सामाजिक क्रांतिचे अग्रदूत महात्मा जोतीबा फुले या तालीमखान्यातील षडयंत्राचा पर्दाफाश करतात. तो कसा....हे पुढील भागात पाहू !
- आनंद गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा