क्रूरकर्माच संत म्हणून मिरवतायेत या बुद्धाच्या देशात.
- आनंद गायकवाड
------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
१९३५, " मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही" अशी घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येवला येथील परिषदेत केली. कोट्यवधी माणसांची माणुसकी हिरावून घेणाऱ्या धर्माला मूठमाती देण्याची घोषणा १४ ऑक्टोबर १९५६ ला मूर्त स्वरूपात साकार झाली. युगानुयुगे पायदळी तुडवलेला समाज येवला मुक्कामी निकराची लढाई लढण्यास सज्ज होतो, त्या भूमीतील माती किती बंडखोर असेल ? ही बंडखोरी तमाम शोषितांच्या रक्तातून उसळ्या मारू लागली. ही क्रांतिकारक घोषणा पददलित माणसांच्या दास्यत्वाच्या शृंखला तोडून त्याला नवजीवन प्रदान करणारी ठरली. नवचैतन्याचे वारे गलितगात्र समाजातून वाहू लागले. ही येवल्याची माती समाजव्यवस्थेतेने अस्पृश्य ठरविलेल्या माणसांना स्वाभिमानाचे आकाश खुले करून गेली. या आकाशात धर्म,रुढी, परंपरा, कर्मकांड व भेदाभेदाने सतावलेले पक्षी मुक्तपणे विहार करू लागले. कोणत्याही भेदाभेदांच्या सीमा असो, त्या तोडण्याची प्रेरणा येवल्याच्या बंडखोर मातीने दिली ही प्रेरणा आपल्या ललाटावर लेवून अनेक शोषितांपैकी एक ' दिशा ' बोलू लागली. तिचेही शोषण हजारो वर्षांपासून होतेय. शोषणाच्या वरवंट्याखाली ती क्षणाक्षणाला चिरडल्या गेली. येवल्याच्या मातीतली बंडखोरी आणि बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन ती पुन्हा जन्माला आली. म्हणून ती म्हणते ,
स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी
परत ती नव्याने जन्माला आली
पण आता ती सहस्रावधी वर्षाच्या
या शोषणाच्या यज्ञात
आहुती द्यायला नकार देते."
ही दिशा कोण आहे ? अस्पृश्यांच्या जगण्याशी समांतर असलेले जीवन जगणे वाट्याला आलेल्या एका उपेक्षित समाजाचा घटक असलेली पण मी जन्मतः स्वतंत्र आहे असा उदघोष करणारी बंडखोर दिशा एक हिजडा आहे. हिजडा असणे हे दिशासाठी गौरवास्पद आहे. लिंगाधारित भेद नाकारून माणसाला माणूस म्हणून पाहणारा आणि घातक रुढी परंपरेच्या चौकटी तोडून वेगळी वाट चोखाळणारा व्यक्ती हिजडा (हिज़रा ) असतो, हे ती ठामपणे सांगते. यासाठी अरबी शब्दार्थांचा आधार ती घेते. समाजात ज्यांची ओळख भटक्या म्हणून आहे त्या समूहात येवला येथे जन्मलेली दिशा आज आपल्या कविता आणि समाजकार्याच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनासाठी सिद्ध झालेली आहे. दिशा पिंकी शेख हे तिचे धर्मनिरपेक्ष नाव.
दिशाचा गुरू एक मुस्लिम व्यक्ती , त्यांचाही गुरू मुसलमानच म्हणून दिशा शेख बनली. कुटुंब आणि समाजाने तिला समजून घेतलं नाही. समाजमान्य तकलादू संकेतांचे कुंपण तोडून गुरू-शिष्यांची परंपरा असलेल्या परिवारात ती दाखल झाली. ही एकलव्याचा अंगठा मागणारी गुरू परंपरा नव्हे तर हरेक क्षणी ठामपणे शिष्याच्या पाठीशी उभी राहणारी बंडखोर जमात आहे. दिशाने इथेच वैचारिक उंची गाठली. अभ्यास , चिंतन , मननाने दिशाला बुद्ध बाबासाहेबांच्या छत्रछायेखाली आणून ठेवले. तिथे नवी दृष्टी गवसली. मनुवादाने , भांडवलशाहीने वा पुरुषसत्ताक व्यवस्थेने स्त्रीचे केलेले शोषण, या सर्वांचा ती ताकदीने विरोध करते. अन्याय सहन करणे व अन्याय करणे या दोन्ही बाबींचा ती खरपूस समाचार घेते. ती म्हणते,
दिशाची कविता समाजव्यवस्थेतील कुरुपता अधोरेखित करते. ज्या समाजाने दिशाच्या परिवाराचे जगणे कुरूप म्हणून निश्चित केले त्या बेगडी समाजाच्या पुढ्यात काही प्रश्न ठेवते. त्या समाजाचा दोगलेपणा, ढोंग आणि विकार ती उघड करते. तिचा कुरूप नावाचा कवितासंग्रह प्रसिद्ध होत आहे. कुरूप या शब्दाचे दोन अर्थ निघतात. एक, जे सुंदरतेच्या विरुद्ध आहे. दुसरा, जी जखम सुकून गेली पण दुरुस्त झाली नाही, जखमेतील ठसठस अजूनही बाकी आहे व ती क्षणाक्षणाला उमळत असते.. याला हिंदीत नासूर असा समानार्थी शब्द आहे. धर्म, वर्ग,जात, लिंगाच्या आधारावर या देशात भेदभाव केला जातो, किंबहुना एका समूहाचे शोषण केले जाते. ही शोषणाची कुरुपस्थळं आणि सौंदर्याचा आव आणणारी व्यवस्थेची कुरूपता यावर दिशाच्या कविता प्रकाश टाकतात. दिशाला हिजडा या अल्पसंख्याकांच्या जीवनातील कुरूपताही अस्वस्थ करीत असली तरी ती वर्तमानातील बलदंड व साधनसंपन्न वर्गाची मुजोरी आणि साधनवंचितांची हतबलता यातील द्वंद्व प्रकाशित करते. दिशाची कविता सर्वहारा समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभी राहते. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या पिळल्या गेलेल्या तमाम दुःखितांच्या वेदना तिला स्व-वेदना वाटतात. कठुआ - उन्नाव मध्ये बलात्कारात बळी पडलेली चिमुरडी आसिफा, संस्थात्मक पातळीवर बळी गेलेला रोहित वेमुला, खैरलांजी मधील उद्ध्वस्त भैयालाल, फासावर लटकलेला गरीब शेतकरी, मुलतत्ववाद्यांच्या श्रीरामी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले अस्पृश्यतेचे जीवन जगणारे घटक, भांडवलशाहीने दुषित केलेले पर्यावरण, कुपोषण आणि धर्मांधांकडून मारल्या गेलेला निर्भीड पत्रकार यातील समान संवेदना दिशाची कविता व्यापून आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या समस्त घटना विविध ठिकाणी घडल्या तरी त्या समान दुःखाने रूपकात्मक गुंफल्या जाऊन त्याची माळ तयार झाली आहे. पण ही माळ गळ्यात घालून मिरवण्यासाठी नव्हे हे कवयित्री जाणून आहे. म्हणून ती स्वतःसह समाजमाध्यमांवर कविता घासणाऱ्या स्थितप्रज्ञांना आडव्या हाताने घेते. ती दलाल माध्यमं व चाळीस पैसेवाल्या अंधभक्तांनाही ठोकून काढते. हे सगळं विपरीत घडत असताना मन की बात करणाऱ्यांना लोकांचे मन कसे कळत नाही आणि लोकंही अशा मिजासखोरांवर हल्लाबोल का करीत नाही असा सवाल दिशाच्या कवितेतून ध्वनित होतो. म्हणून तिची कविता आणि हक्काची लढाई अधुरी राहते. ही अर्धवट कविता एका संपूर्ण क्रातीची पृष्ठभूमी तयार करते, शोषितांच्या समस्त प्रस्तराला जोडते आणि ऐक्याची हाळी देऊन शोषकवर्गाविरुद्ध शोषितांना संगरासाठी रणभूमीवर उभं करते, पुढील आक्रमणासाठी ! पाहुयात ही काळजात घुसणारी दिशाची कविता, अगदी सोप्या भाषेत.....!
कविता
असिफा उन्नाव मध्ये न्यायासाठी कोर्टाच्या चकरा मारत असताना ट्रक खाली चिरडल्या गेली,
तिला वाचवता वाचवता माझा बाप भैय्यालाल भोतमांगे
कोर्टाच्या पायरीवरच मेला,
त्याचं प्रेत उचलायला खांदेकरी सापडत न्हवते कारण तो अस्पृश्य होता,
मग त्याचं मढं माझ्याच एका नातलगानं सायकलवर काही कोस नेलं,
वाटेत जातीव्यवस्थेनं बांधलेला डिजिटल पूल बाटु नये म्हणून त्या माझ्या मढं वाहणाऱ्या नातलगाला अडवण्यात आलं,
कसंतरी मढं एका गटारी शेजारी जाळून तो जेव्हा घराकडं फिरला, काही देशभक्तीचा वारसा सांगणाऱ्या भक्तांनी त्याला घेरला
'जय श्रीराम' म्हणायला लावून
चिंधड्या चिंधड्या करून मारला,
बातमी करायला गेलेल्या पत्रकाराला घरात घुसून गोळ्या घालण्यात आल्या,
त्याच्या मृत्यूकडे पाहून बाकीच्यांनी समोर टाकलेली पाकीटं उचलली
आणि दिवसभर लोकांना 'मन कि बात' सांगितली,
मग विकास होतोय या भ्रमात लोकं राहू लागले
पण,
माझा भाऊ रोहित बंडखोर होता
त्याला शिकायचं होतं,
खोट्या रूढी परंपरांचं ओझं नाकारायचं होतं,
आमच्या समोर ताठ मान करून चालतोय म्हणून त्याला छळण्यात आलं,
एव्हडे केले त्याचे हाल कि त्यानं मरण कवटाळलं,
त्याचं प्रेत विद्यापीठाच्या पायात पुरण्यात आलं,
तेव्हा कळलं एकलव्यापासून सगळे रोहित असेच मेले,
माझी माय गेलती त्याला शोधायला अजून घरी वापस नाही आली.
शेतकरी दादा सांगत होते,
सत्य शोधणारे, प्रश्न विचारणारे, आणि कष्ट करणारे या देशात फासावर लटकावून मारले जातात,
उरलेले भुकेने मरतात.
त्यातलाच एक लहान मुलगा सरकारी दवाखान्यात ऍडमिट केला,
बिचारा तो कुपोषित मुलगा
आपल्या सारख्याच हजारो भावंडासह औषध पाण्यावाचून तडफडून मेला.
हजारो आकडा लहान होता
म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी मनातली सल घालवण्यासाठी,
त्यांच्या सोयीने गंगेचा विशिष्ट कप्पा फिल्टर करून गंगास्नान केले.
बाकीच्या गंगेत आजही मोक्षाच्या नावावर मढे,
विकासाच्या नावावर कंपन्यांच्या केमिकलचे झरे सोडण्यात आलेत.
भांडवलदारांच्या मलमूत्राचे तीर्थ लाखो भक्त पितात या देशात श्रद्धेने आणि आणतात भरून कलशात पूजेसाठी.
शिक्षणाच्या बाजारात निजवली जातेय गरिबी राजरोस आणि
तिच्या दलालीवर शिक्षण सम्राट कमवतायत भरघोस.
दलालांच्या टोळ्या भाड खाण्यासाठी लेकीबाळीच्या टिरिवर पोलिसांनी मारलेल्या दांड्यांचंही समर्थन करतायेत,
इथे कितीतरी रोज पत्करतात गुलामी आता काहीच होऊ शकणार नाही म्हणून,
आणि जिवंतपणीच मरतायेत..
क्रूरकर्माच संत म्हणून मिरवतायेत या बुद्धाच्या देशात,
इथे कसायांनी दुकानं लावलीयेत रखवालदाराच्या वेशात,
मी नेभळट फेसबुकवर कविता लिहितेय विभत्स, क्रूर, अवहेलनेने भरलेले व्हिडिओ शेअर करतेय,
किंवा चालवते हॅश टॅग एखादा,
हॅश टॅग वरून एक आठवलं बघा,
सो कॉल्ड पुरोगामी सुद्धा चालवतायेत माझ्या बचावाचे, समर्थनाचे हॅश टॅग,
त्यांच्या नावातील,जातीतील सरंजामीच लेबल कायम ठेवत,
सेक्युलर इझमचं समर्थन करत..
काही बिचारे ४० पैशे एका खेपेवर आहेत खुश,
त्यांच्यातले आणि काही माझ्यातलेही.
माझ्या बापाच्या नावाचा वापर निरोधासारखा करतात,
आणि क्रांतीचे शुक्राणु शोषितांच्या गर्भात जाण्याऐवजी टाकतात कचरा कुंडीत,
स्वतःसकट समाजालाही कुजवून मारतात उतरंडीत, वाड्यावर मुजरा करणारे देशभक्ती, गरिबी, विषमता यांच्या विरोधात गातात,
स्वतःच्या जातीवर आलं की लोकांच्या तोंडात देतात मुताने भरलेल्या धरणातील
पाण्याची गुळणी,
माझ्यातले काही त्यातही आयोडीन शोधतात.
आणि माझ्यासारखे हतबल करतात कविता उबळ काढण्यासाठी
बहुतेक ह्या निराशेची, ह्या शोषणाची शेवटची ओळ मी लिहू शकणार नाही म्हणून माझी ही कविता अर्धवट सोडत आहे.
- दिशा पिंकी शेख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा